एक NRI.. वर्षानुवर्षं बाहेर राहिलेला. मनाने तरीही भारतातच रमणारा. जगणं कोणाला कुठे आणि कसं नेईल सांगता येतं का? असाच प्रवाहाबरोबर वहात आलेला तो… भारतात मिळणाऱ्या पदार्थांची चव अजून जिभेवर जपून ठेवणारा.. मधून मधून परदेशातल्या भारतीय हॉटेल मध्ये त्याच नावाच्या पदार्थांच्या फसवणुकीवर समाधान मानून घेणारा… त्याच्या जिभेचे मनसुबे त्याला परत परत भारतात घेऊन येतात. २० वर्षांपूर्वीचं आयुष्य परत एक महिना जगायचं हाच प्रत्येक ट्रिपचा उद्देश.. मग कोपर्यावरचा वडा पाववाला, पुढे गेलं की सामोसा, कुठे पाव भाजी तर कुठे कबाब तर कुठे भेळपुरी.. सर्व सर्व हवं असतं पण सर्व एका वेळी खाता मात्र येत नसतं, कारण हे शरीर आता या सर्वाची सवय घालवून बसलेलं असतं. पण तरीही तो जातो.. हट्टाने दत्त स्नॅक्सच्या दारांत उभा रहातो.. त्या वासाने इतके दिवस धरून ठेवलेला संयम तुटायला लागतो आणि काहीही विचार नं करता लगेच दोन वडा पावची ऑर्डर जाते. “साहेब यात कांदा घालू का?”, “हे नवीन बघा की try करुन”.. हे काही काही नको असतं. फक्त पूर्वीसारखा गरमागरम कुरकुरीत कंगोरे आलेला झणझणीत वडा, आत एक ओली आणि एक लाल सुकी चटणी आणि तोच...